"सरकारकडून श्रीवर्धन मतदार संघात पर्यटन विकासाच्या मंजूर निधीला ब्रेक" -खासदार सुनिल तटकरे

तळा- संजय रिकामे 

शिंदे- फडणवीस सरकारने श्रीवर्धन मतदार संघात पर्यटन विकासाच्या मंजूर निधीला ब्रेक लावला असल्याचे सांगून;  हा प्रश्न आता न्यायालयात प्रलंबित असून त्याचा निकाल आपल्या बाजूने लागेल असा विश्वास खा.सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. मालाठे येथे श्री द्रोणगिरी देवस्थान मंदिर भूमिपूजन सोहळा खा.तटकरे यांच्या शुभ हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते या भूमिपूजन सोहळ्यासाठी गीरणे ग्रामपंचायत सरपंच ज्योती पयगुडे,उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष नाना भौड,सामाजिक विभाग रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.उत्तम जाधव,जिल्हा उपाध्यक्ष कैलास पायगुडे,माजी राजीप सभापती हिराचंद तांबे, शहर अध्यक्ष महेंद्र कजबजे, युवक अध्यक्ष नागेश लोखंडे,निखिल लोखंडे,माजी उपसभापती चंद्रकांत राऊत,धनराज गायकवाड,रमेश लोखंडे,मंगेश भगत मलाठे ग्रामस्थ मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                       महाविकास आघाडी सरकारच्या काळात रायगडच्या तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी कोटी रुपयांचा निधी आणला होता.परंतु शिंदे फडणवीस सरकारने या निधिला ब्रेक लावला आज रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन मतदार संघ सोडून इतर मतदार संघात हा निधी वितरीत केला जात आहे श्रीवर्धन मतदार संघाला वगळले जात आहे, या विरोधात न्यायालयात दाद मागितली असून कदाचित त्याचा निकाल आजच लागेल आणि तो आपल्या बाजूने लागेल असा विश्वास त्यांनी या कार्यक्रमा निमित्ताने व्यक्त केला आ.अदिती तटकरे यांच्या आमदार फंडातून १५ लक्ष रुपयांचा निधी श्री.द्रोणगिरी देवस्थान मंदिरसाठी देण्यात आला आहे या कामाची सुरवात झाली की नंतर पुन्हा एप्रिल महिन्यामध्ये जो काही वाढीव निधी लागेल तो शंभर टक्के देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.                                                                                   या गावाशी माझे जुने ऋणानुबंध असून स्वर्गीय अशोकशेठ लोखंडे यांच्या संकल्पनेतून जी राहिलेली विकासकामे आहेत ती मी पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले गिरणे ते हालकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्यात येईल,आदितीच्या प्रयत्नाने गिरणे येथे कृषी विद्यापीठ मंजूर झाले आहे त्याची जमीन अधिग्रहण झाली असून ते काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे मी खासदार आणि अदिती आमदार असताना मोठ्या प्रमाणात कामे गिरणे ग्रामपंचायत मध्ये झालेले आहेत गिरणे ग्रामपंचायत सरपंच ज्योती पायगुडे यांचे काम देखील चांगल्या प्रकारे सुरू आहे सरपंच यांच्या संकल्पनेनुसार खादी ग्रामोद्योग व सूक्ष्म लघुउद्योग या योजनेअंतर्गत सर्व बँकेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांना बोलवून महिला सक्षमीकरणासाठी मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            कार्यक्रमापूर्वी मलाठे ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात खा.तटकरे यांचे जंगी स्वागत केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील लोखंडे यांनी केले तर प्रास्तविक युवक अध्यक्ष नागेश लोखंडे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मालाठे ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ,मुंबईकर मंडळ यांनी विशेष मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog